शनिवार, २३ मे, २०२६

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

 
शिर्डी, 

संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योगांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कंपन्यांकडून होणारे संशोधन हे संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांना अधिक मजबूत करीत असल्याने केंद्र सरकारनेही खासगी उद्योगांना पाठबळ देऊन सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. खासगी उद्योगाचे सामर्थ्य जेवढे वाढेल तेवढी सुरक्षा अधिक मजबूत होईल. यातून भारत देश संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये 'निबे उद्योग समूहा'च्या वतीने विकसित करण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन आणि सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, लेफ्टनंट जनरल संदीप जैन, अनुप सिंघल, डीआरडीओचे सेक्रेंटरी डॉ.समीर कामत, केंद्रीय सचिव संजीव कुमार, ब्रह्मविहारीजी महाराज, आ.राणाजगजितसिंह, आ.मोनिका राजळे, आ. विक्रमसिंह पाचपुते, आ.आशुतोष काळे, आ.अक्षय कर्डिले यांच्यासह संरक्षण आणि उद्योग विभागाचे अधिकारी आणि प्रकल्पाचे प्रवर्तक गणेश निबे उपस्थित होते.

आपल्या भाषणात गणेश निबे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख करून मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "येथे आल्यानंतर या प्रकल्पाचे महत्त्व आपल्याला समजले. भारतामध्ये बुद्धिमत्तेची कमतरता नाही. असलेल्या साधनांचा उपयोग करून, बुद्धिमत्तेच्या जोरावर भारत देशाला निर्यातदार होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही." हे स्पष्ट करून त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. सुशासन आणि स्वाभिमानाचा संदेश त्यांनी आपल्याला दिला. आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेचे मॉडेल शिवाजी महाराजांनी निर्माण करून दाखविले. लढाईसाठी लागणारे साहित्यही त्यांनी स्‍थानिकांकडून बनवून नवे साम्राज्य उभे करून दाखविले. हीच भूमिका लोकमान्य टिळकांची होती. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हा संदेश देणाऱ्या या महाराष्ट्राच्या भूमीने आता संरक्षण व्यवस्थेतही खासगी उद्योगांच्या माध्यमातून एक नवा विश्वास निर्माण केला आहे.

संरक्षण उद्योग मजबूत होण्यासाठी खासगी उद्योगाला केंद्र सरकारने पाठबळ देण्याचे धोरण घेतले आहे. यामुळे धोरणात्मक सुधारणा होत असून थेट परकीय गुंतवणुकीसही प्रोत्साहन मिळत आहे. परवाना प्रक्रियेचे सुलभीकरण आणि स्वदेशी नीतीला चालना मिळत असल्यामुळेच खासगी उद्योग समूहांचा सहभाग संरक्षण उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढला आहे. हा वाटा आता २५ ते ३० टक्क्यांवर पोहोचला असल्याचे त्यांनी सांगितले.  आधुनिक तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्तेचा वापर करून, खासगी उद्योग समूह करीत असलेली वाटचाल ही ऊर्जा निर्माण करणारी असून, यातूनच विकासाचा रोडमॅप तयार होत आहे. निबे उद्योग समूह यासाठीचे मोठे उदाहरण असून, या उद्योग समूहातून निर्माण होणारे संरक्षण साहित्याचे उत्पादन पाहता हा उद्योग समूह देशासाठी अनेक वर्षांचा माईलस्टोन ठरेल.

भारताचे सामर्थ्य हे आता शिर्डीच्या भूमीतूनही सिद्ध होणार आहे. हा उद्योग केवळ उत्पादनासाठी मर्यादित नाही, तर यातून अर्थव्यवस्था मजबूत होईलच, पण औद्योगिक स्थिरताही मिळेल. अनेक खासगी कंपन्या आता संरक्षण उत्पादनामध्ये भागीदारी करण्यासाठी पुढे येत असल्यामुळे एक 'इको सिस्टिम' निर्माण होत असून, संरक्षण उद्योगही मजबुतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. 'ऑपरेशन सिंदुर मध्ये भारताने आपले सामर्थ्य सिद्ध करून दाखविले आहे. भविष्यातही खासगी क्षेत्राच्या माध्यमातून संरक्षण उत्पादनाची निर्मिती चांगल्या पद्धतीने होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "आजचा दिवस देशाकरिता ऐतिहासिक असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' हे जे संदेश दिले होते, ते संरक्षण क्षेत्राने प्रत्यक्षात अमलात आणले आहेत. त्यामुळे देश आता स्वदेशी पद्धतीने बनविलेल्या उत्पादनांचा निर्यातदार बनला आहे." राज्यात चार डिफेन्स कॉरिडॉर तयार करण्यासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे. यामुळे आता महाराष्ट्र राज्य संरक्षण उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर येथे संरक्षण उद्योग समूह विकसित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. "गणेश निबे यांच्यासारखे युवक या क्षेत्रात करीत असलेले काम भूषणावह आहे. नवीन तंत्रज्ञान आणून देशासाठी काहीतरी निर्माण करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे. आत्मनिर्भर भारताकरिता नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम 'निबे उद्योग समूह' करीत आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

याप्रसंगी गणेश निबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आभार मानले. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या संरक्षण उत्पादनाच्या प्रदर्शनाला संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. निबे उद्योग समुह आणि विविध अंतराष्‍ट्रीय कंपन्‍यांमध्‍ये महत्‍वपूर्ण करार करण्‍यात आले. ऑप्‍टीकल सॅटेलाईट आणि ब्‍लॅक स्‍काय कंपनी तसेच सीप्‍लेन निर्मितीसाठी कॅनेडीयन कंपनी हॅवीलॅन्‍ड सोबत स्‍वाक्षरी करण्‍यात आली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. उद्घाटन सोहळ्यापूर्वी भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलांच्या लेफ्टनंट जनरलनी विद्यार्थी, नागरिक आणि विज्ञानप्रेमींशी संवाद साधला.

शुक्रवार, २२ मे, २०२६

तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण प्रकरणी आरोपी शरद पवार यांचा जामीन अर्ज फेटाळला

तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण प्रकरणी आरोपी शरद पवार यांचा जामीन अर्ज फेटाळला

अहील्यानगर 

खासदार निलेश लंके यांच्या सोशल मिडियाचे काम करणाऱ्या किशोर महादेव परभणे यांना अमानूष मारहाण  केल्‍याच्‍या कारणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेला चिंचोडी पाटीलचा सरपंच आणि खासदार निलेश लंके समर्थक आरोपी शरद खंडू पवार याचा जामिन अहिल्‍यानगर येथील अतिरिक्त मुख्‍य न्‍याय दंडाधिकारी श्री एस आर शिंदे  यांनी फेटाळला आहे.

   सोशल मिडीयावर व्‍हीडीओ पोस्ट केल्‍याचे कारणाने किशोर महादेव परभणे यांचे अपहरण करुन, त्‍यांना खोलीत डांबून ठेवत अमानुष मारहान केल्‍याची घटना घडली होती. त्‍यांनी दिलेल्‍या फिर्यादीवरुन प्रणव विजय मोरे, शरद खंडू पवार, मारुती देवराम कोकाटे यांच्‍यावर ४ मे २०२६ रोजी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्‍याबाबत सोशल मिडीयावर व्‍हीडीओ पोष्‍ट केल्‍याच्या रागातून अपहरण आणि मारहाणीची घटना घडली होती.

      या घटने संदर्भात पोलिसांनी शरद खंडू पवार यास अटक करुन, अहिल्‍यानगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री एस आर शिंदे  यांच्या  न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने त्‍यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. पवार हा कोठडीत असताना तपासी अधिका-यांना या संदर्भात उडवा उडवीचे उत्‍तर देत समाधानकारक माहीती न दिल्‍याने पोलिसांनी त्‍यास पुन्‍हा न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने त्‍याची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत केली. 

जामीन मिळावा म्‍हणून, शरद खंडू पवार याने न्‍यायालयात प्रयत्‍न केले होते. याबाबतची सुनावणी अहिल्‍यानगर येथील अतिरिक्‍त  न्‍यायदंडाधिकारी श्री एस आर शिंदे कोर्ट क्रमांक 17 यांच्‍यासमोर झाली. मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड.आनंद व्‍यवहारे यांनी बाजू मांडली तर, सरकार पक्षाच्‍या वतीने अॅड. धैर्यशील उर्फ अजित लक्ष्‍मण वाडेकर यांनी बाजू मांडून शरद पवार यांच्‍या जामीण अर्जास विरोध केला.

       न्‍यायालयाने दोन्‍हीही बाजूचा युक्‍तीवाद ऐकून घेतल्‍यानंतर शरद खंडू  पवार याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता या घटनेत शरद खंडू पवार याच्‍या चौकशीतून बरेच कारनामे समोर येण्‍याची शक्‍यता आहे.

गुरुवार, २१ मे, २०२६

शिर्डी मध्ये २३ ते २४ मे रोजी संरक्षण उत्पादनाच्या प्रदर्शानाचे आयोजन विद्यार्थी नागरिकांना राॅकेट आणि क्षेपणास्त्र पाहाण्याची संधी!

शिर्डी मध्ये २३ ते २४ मे रोजी  संरक्षण उत्पादनाच्या प्रदर्शानाचे आयोजन

 विद्यार्थी नागरिकांना राॅकेट आणि क्षेपणास्त्र पाहाण्याची संधी!


शिर्डी, 

 शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या  उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने २३ आणि २४ मे २०२६ रोजी विद्यार्थी आणि नागरीकांसाठी  संरक्षण साहीत्याच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये  राॅकेट आणि क्षेपणास्त्र विशेष आकर्षण असणार आहेत.
 देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सावळीविहीर येथील औद्यगिक वसाहती मध्ये निबे गृपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहाणार आहेत. अहील्यानगर जिल्हयात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या प्रकल्पामुळे  अहील्यानगर जिल्हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून भविष्यात ओळखला जाईल.या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफ गोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार असून, प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची आहे.संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान व कच्चा माल स्वदेशी आहे. हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभारण्यात आला आहे. 

शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून  यामध्ये रॉकेट लाँचर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन व विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. 

 उद्घाटनाच्या निमित्ताने २३ व २४ मे रोजी सकाळी साडेदहा ते पाच या वेळेत विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या व शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.यासाठी मोठे स्टाॅल प्रकल्पस्थळावर उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी  विज्ञानप्रेमी, नागरिक, महीला  या प्रदर्शनाला भेट देतील व तरुणांसाठी संरक्षण क्षेत्रातील संधी जाणून घेण्याची ही मोठी संधी निर्माण करुन देण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याला संरक्षण क्षेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून, रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के.के. रेंजेस व मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे जिल्ह्याला आधीपासूनच संरक्षण क्षेत्रातील महत्त्व आहे. संरक्षण उत्पादन प्रकल्पामुळे या ओळखीला अधिक बळ मिळणार आहे.

बुधवार, २० मे, २०२६

१७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण

१७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण


अहिल्यानगर 

 शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटन २३ मे रोजी सकाळी १० वा. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण व कृषी मंत्री दत्तात्रय विठ्ठल उर्फ दत्ता मामा भरणे यांच्या शुभहस्ते हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्रामभैय्या जगताप,महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतराव डांगे, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे,१६ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष  संपतदादा बारस्कर,१६ वे संमेलनाध्यक्ष डॉ.संजीवनीताई तडेगावकर, माजी संमेलनाध्यक्ष व माजी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर व संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. संदीप सांगळे हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा स्वागताध्यक्ष  सुरेश बनसोडे व शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली.
     उद्घाटनापूर्वी महापुरुषांना अभिवादन करून शाहिरी जलसा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.यामध्ये शाहीर कल्याण काळे,भारुड सम्राट हमीद सय्यद, शाहीर भारत गाडेकर, वसंत डंबाळे, डॉ.शेषराव पठाडे, प्रशांत सूर्यवंशी, दिगंबर गोंधळी, हौसीनाथ बोर्डे व शब्दगंधची टीम सहभागी होणार आहे.दुपारी २  वाजता "आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचे चित्रण" या विषयावर निलिमाताई बंडेलु यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यामध्ये संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्त्यां निलीमा क्षत्रिय, मॅक्सवुमन मुंबईच्या संपादिका प्रियदर्शनी हिंगे सहभागी होणार आहेत. 

दुपारी ३ ते ५ कवयित्री माधुरीताई मरकड यांच्या अध्यक्षतेखाली खुले काव्य संमेलन ( कवी कट्टा)होणार असून यावेळी दंगलकार नितीन चंदनशिवे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे,प्राचार्य चंद्रकांत भोसले, प्रा.शशिकांत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दुपारी ५ वाजता " बदलते ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृती " या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यामध्ये प्राचार्य डॉ.संजय नगरकर, लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके,साथी शिवाजी नाईकवाडी, प्रा.डॉ.गणेश मोहिते सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे चे कोषाध्यक्ष,गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या अध्यक्षतेखाली गझल काव्य संमेलन होणार असून यामध्ये माधव सावंत, हनुमंत येवले, संजय पठाडे, रज्जाक शेख ,साहेबराव घुले, सरिता कलडोणे, प्रशांत वाघ, विक्रम कांबळे, राम गायकवाड, बबन धुमाळ,इकबाल काकर, बाळासाहेब गिरी, अरुण कटारिया, धनंजय तांदळे, सुहास घुमरे, हुमायून आतार,अजय त्रिभुवन, कुणाल शिरोडे, राजू आठवले, अंजली दीक्षित सहभागी होणार आहेत. 

   रविवारी सकाळी ९/३० वा.कथा व काव्य लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रा.डॉ.संजय पाईकराव, संदीप रोहकले यांच्या हस्ते होणार असून प्राचार्य डॉ.अशोकराव ढगे,प्राचार्य बाळासाहेब सागडे,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह जयंत येलूलकर, अभिनव खानदेश चे संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहेत.प्रारब्ध - सौ.एस.एम. मिर्झा, अंतरी - सुरेखा घोलप, माणसं असे अन तसेही - बाळासाहेब देशमुख, निशब्द भावना - विनय पिंपरकर इत्यादी पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होणार आहे. 

सकाळी १०/३०  वा.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य कविवर्य प्रकाश होळकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रिताचे काव्य संमेलन होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आठव्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कविवर्य प्रकाश घोडके, हनुमंत चांदगुडे उपस्थित राहणार आहेत.या काव्य संमेलनात बाळ पाटील, चंद्रकांत कर्डक, भास्कर निर्मळ,दशरथ शिंदे, शारदा घोडके, डॉ.कैलास दौंड, अर्जुन देशमुख, शुभांगी राऊतमारे, लक्ष्मण खेडकर, वर्षा चौबे,डॉ.स्वाती पाटील, वसंत मुरदारे,अशोक निंबाळकर,माधुरी चौधरी, डॉ.प्रवीण जाधव, प्रवीण घुले, संदीप राठोड, नागेश शेलार, स्नेहल डाडर,नवनाथ केंदळे, अनिल कुमार होळकर,रिता जाधव इत्यादी महाराष्ट्रातील कवी यामध्ये सहभागी होणार आहेत.
      दुपारी २  वा. असा मी घडलो... हे चर्चासत्र बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  गुलाबराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यामध्ये पद्मश्री राहीबाई पोपेरे,वरिष्ठ तुरुंग अधिकारी रेवणनाथ कानडे, साई एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ.सचिन पांडुळे इत्यादी सहभागी होणार आहेत. 
दुपारी तीन वाजता ग्रंथविक्रेत्यामुळे वाचन चळवळीला पाठबळ मिळते का या विषयावर चर्चासत्र होणार असून यामध्ये लेखक प्रकाशक वाचक साहित्यिक ग्रंथ विक्रेते सहभागी होणार आहेत.
रविवारी दुपारी ४ वा.१७ व्या शब्दगंध संमेलनाचे पारितोषिक वितरण व समारोप अहिल्यानगर चे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असून यावेळी माजी आमदार कविवर्य लहू कानडे, पाथर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्ष अभयराव आव्हाड,सीएसआडीचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, बापूसाहेब भोसले, कॉ. बाबा आरगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

या संमेलनात प्रा.डॉ.गणी पटेल, छत्रपती संभाजीनगर व आयु. अशोकराव गायकवाड, अहिल्यानगर यांना शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून मातोश्री यमुनाबाई पांडुळे स्मृती पुरस्कार ॲड रंजनाताई गवांदे यांना देण्यात येणार आहे.तसेच विविध साहित्य कृतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.आत्तापर्यंत झालेल्या शब्दगंध संमेलनाध्यक्षांची भाषणे " शब्दसंचित " या सुनील गोसावी संपादित ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
१७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनातील सर्व कार्यक्रमांसाठी साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे,शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे,संयोजन समिती सदस्य संजय खामकर,परिमल निकम,जयंत गायकवाड, भगवान राऊत, डॉ.अशोक कानडे, भारत गाडेकर, जयश्री झरेकर, प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर, राजेंद्र फंड, प्रा.डॉ. अनिल गर्जे,स्वाती ठुबे, बबनराव गिरी,सुभाष सोनवणे,हर्षल आगळे, मकरंद घोडके, शर्मिला गोसावी,राजेंद्र पवार, रवींद्र दानापुरे, प्रशांत सूर्यवंशी व राजेंद्र चोभे यांनी केले आहे.

मंगळवार, १९ मे, २०२६

गोदावरी वसाहत आणि 340 गट नंबर मधील जागा रहिवाश्यांच्या नावावर करणार - डॉ. विखे पाटील

गोदावरी वसाहत आणि 340 गट नंबर मधील जागा रहिवाश्यांच्या नावावर करणार - डॉ. विखे पाटील 


राहाता 
 राहाता तालुक्यातील साकुरी येथील गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे नाव सात बारा उताऱ्यावर येईल. आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पाळला असल्याचे प्रतिपादन भाजपा चे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. .

  राहाता तालुक्यातील साकुरी येथील गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे जागेच्या संदर्भात विशेष पाठपुरावा करून तेथील रहिवाश्यांच्या नावावर जागा करण्याबाबत डॉ. विखे पाटील यांनी रहिवाशी व स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक राहाता बाजार समितीत घेतली. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ, मोहन सदाफळ, संजू सदाफळ, डॉ स्वाधीन गाडेकर, नगराध्यक्ष, विजय सदाफळ उपनगराध्यक्ष नगरसेवक कैलास सदाफळ, मुन्ना शहा, राजेंद्र निकाळे, सुधाकर दंडवते, कानीफ बावके, संदिप दंडवते, भारत बनसोडे, सचिन बनसोडे, शिवाजी नजन,सतिश बावके, विकास बावके, हरिश श्रीखडे, रमेश गायकवाड, पप्पू बनसोडे, बबन बनसोडे, अक्षय रोहोम, बाबासाहेब डांगे, रावसाहेब बनसोडे, पुंडलिक बावके, नंदा माळी, चंद्रकांत बनसोडे, बाळू जाधव, सुनील लोखंडे, दीपक शिंदे, दीपक दंडवते, शहा, किशोर दंडवते आदी यावेळी उपस्थित होते. 
       आपल्या भाषणात डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, राहाता येथील 340 आणि साकुरीची गोदावरी वसाहत या जागेबाबत अनेक मोठ्या तंत्रिका अडचणी निर्माण झाल्या होत्या. जागा वनविभागाची आहे आणि अनेक अडचणी येतील अशी काहींनी शंका उपस्थित केली होती. परंतु सुजय विखे पाटलांनी दिलेला शब्द पूर्ण करतात, हा सर्व सामान्य जनतेला विश्वास होता. आणि आपण या बाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून विश्वास सार्थ ठरवला. या जागेच्या बाबतीत सर्वात मोठी अडचण सातबाऱ्यावर सरकार असे नाव लागले होते. गुंतागुंत वाढली होती. परंतु दोन दिवस आधी आपण महाराष्ट्र शासन असे नाव लावून घेतले. त्या मुळे आता कायदेशीररित्या स्थानिक नागरिकांच्या नावावर जागा करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या मुळे तुमची जागा तुमच्या नावावर फक्त आणि फक्त सुजय विखे च करू शकतो! असे सांगून डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, अनेक वर्षापासून जागा नावावर करण्याचा संघर्ष 340 व गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे संपला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा प्रश्न सोडविला. विधानसभेच्या निवडणुकीत तुमची जागा तुमच्या नावावर करून देतो हा शब्द आपण पाळला. याचा आपल्याला अभिमान आहे. आपण राजकारणात ऐश्वर्य कमावले, वैभव कमावले परंतु आपण विश्वासाहर्ता कमावली हा मोठा आनंद आहे. शिर्डीतील लक्ष्मीनगर भागातील आपल्या शब्दावर काढले. पोलिस फाटा लागला नाही. त्या मुळे आता प्रत्येकाच्या नावावर 25 लाख रुपये किमतीची जागा झाली आहे. 
      सर्वांच्या विश्वासामुळे पालिकेत निर्विवाद सत्ता मिळाली. साकुरीतही आपण 5 कोटींचे कामे करू शकलो. अंतर्गत गटारी, रस्त्यांचे कामे मार्गी लागली. तुम्ही सर्वजण मतभेद विसरून एकत्र आला म्हणून हे शक्य झाले. राहाता शहराला किती निधी दिला. हे मी आत्ता सांगणार नाही. 
    मतदार संघात धर्म, जात याला थारा देणार नाही. गुन्हेगारीला साथ देऊ नका. आपल्याला मतदार संघातील गुन्हेगारी मोडीत काढायची आहे. मुलींची कुणी छेड काढत असेल तर त्याच्या घरावर बुलडोझर चालविण्यास मागे पुढे पाहणार नाही. असा इशारा डॉ. विखे पाटील यांनी गुन्हेगारांना दिला.

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D2, झोन 16 अहिल्यानगर झोन SOCIAL 2026

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D2, झोन 16 अहिल्यानगर झोन SOCIAL 2026 


राहता येथील साई विठ्ठला लॉन्स येथे दिनांक 22 मे रोजी अहिल्यानगर झोनचा बहुप्रतिक्षित “झोन SOCIAL” कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन अहिल्यानगर झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2026-27 लायन श्रेयस दीक्षित, फर्स्ट व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र गोयल, सेकंड व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन सुनीता मालपाणी, पास्ट मल्टिपल कौन्सिल चेअरमन लायन गिरीशभाऊ मालपाणी, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश कोठावडे, कन्व्हेनर लायन सुधीर डागा व को-कन्व्हेनर लायन प्रकाश सदाफळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 9 लायन्स क्लब व 3 लिओ क्लबमधील प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर, कॅबिनेट ऑफिसर्स, सिनियर पदाधिकारी व जवळपास 200 लायन सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

या “झोन SOCIAL” मध्ये विविध आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये — 📸 फोटो कॉन्टेस्ट
🎨 बॅनर प्रेझेंटेशन
🎶 समूह गायन स्पर्धा
🎵 धमाल संगीत संध्या

यांचा समावेश आहे.

संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, अंध-अपंग सेवा व समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या क्लबचा गौरव झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. विविध क्लबच्या उत्कृष्ट कार्याची माहिती सर्वांसमोर मांडून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

राहता येथे प्रथमच डॉ. संजय उबाळे यांच्या रूपाने इतक्या मोठ्या स्तरावर झोन SOCIAL चे आयोजन होत असून, त्यामुळे राहता शहरासाठी हा अभिमानाचा क्षण ठरत आहे. राहता क्लबचे सर्व सदस्य एकदिलाने कार्य करून क्लब वृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

या कार्यक्रमासाठी लायन एकनाथ गोंदकर, लायन श्रीनिवास भंडारी, लायन तुलसीदास खुबानी, प्रविण गुलाटी, हरजितसिंग वाधवा, संदीप रोहमारे, आशिष बोरावके, आनंद ठोळे, कल्याण कासट, राहुल अरबटी, अक्षय गिरमे, महेश वैद्य, संजय असावा, संतोष माणकेश्वर, संदीप गोंदकर, धनंजय धुमाळ, सचिन शहा व इतर अनेक लायन सदस्य उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन डॉ. संजय गायकवाड, प्रकाश सदाफळ, ॲड. गोरखभाऊ दंडवते, दीपक दंडवते, ॲड. संतोष घोडके, ॲड. दिनेश कारले, मुन्नाभाई शहा, व्यंकटेश अहिरे, राजेंद्र बांगर, सुनील हासे, नीलेश चोरडिया, डॉ.लीना उबाळे,संतोष उबाळे, साहेबराव गायकवाड, डॉ.जयंत घोडेराव,सुरेश गायकवाड ,अंजली उबाळे, सोहन उबाळे, सरला तायडे, स्मिता मुरादे, उमेश शेटे, लता जाधव,डॉ मनाली उबाळे, डॉ. शर्वरी कुलकर्णी, संध्याताई कारले, श्वेता कारले, अर्चना दंडवते, रतन चौधरी, खिजर शहा, आसावरी बेंद्रे तसेच राहता क्लबचे सर्व पदाधिकारी व सभासद परिश्रम घेत आहेत.

🌟 हा कार्यक्रम आनंद, मैत्री, सेवा आणि उत्साहाचा अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे. 🌟
झोन कार्यक्रमासाठी झोन चेअरमन डॉ संजय उबाळे, कन्व्हेनर लायन सुधीर डागा, झोन सेक्रेटरी लायन ॲड कल्याण कासट, ट्रेजरर लायन संदीप  राशीनकर यांनी उपस्थित राहावे असे आव्हान केले आहे

सोमवार, १८ मे, २०२६

फळबागांचे मोठे नुकसान; प्रभावती घोगरे मैदानात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

फळबागांचे मोठे नुकसान; प्रभावती घोगरे मैदानात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

(राहाता)
 : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती घोगरे यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
गोगलगाव येथील रहिवासी शेतकरी विनायक चौधरी यांच्या संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथील शेतातील फळबागेला या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर मोठ्या प्रमाणावर कच्ची फळे गळून पडली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पाहणीदरम्यान प्रभावती घोगरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानाचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश देत शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
“अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने विलंब न करता तातडीने मदत जाहीर करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी,” असे त्या म्हणाल्या.
तसेच, भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, पीक विमा योजनांचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पाहणीवेळी विलास गुळवे, शेतकरी विनायक चौधरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही आपल्या नुकसानीबाबत माहिती देत शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

शिर्डीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कारखान्याचे २३ मे रोजी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शिर्डीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कारखान्याचे २३ मे रोजी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ! 

जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना !

१५५ मिली मीटर‌‌ क्षमतेचे प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार होणार

शिर्डी, दि.. १८ :- अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत असून, शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन येत्या २३ मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार असून, या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक तथा चेअरमन रविकांत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार असून, प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची असेल. खासगी क्षेत्रातील तोफगोळा उत्पादनाची ही देशातील सर्वांत मोठी क्षमता मानली जात असून, संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान व कच्चा माल स्वदेशी आहे. हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ व ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनांना बळ देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत. यामध्ये रॉकेट लाँचर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन व विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. या प्रकल्पांसाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, त्यापैकी सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक पूर्ण झाली आहे. या माध्यमातून सुमारे दोन हजार नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. याच दिवशी प्रतिदिन पंधरा टन क्षमतेच्या बायो-सीएनजी प्रकल्पाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुमारे सहाशे एकर जागेवर भव्य दारूगोळा निर्मिती संकुल उभारण्यात येत आहे. या संकुलात टीएनटी, आरडीएक्स, एचएमएक्ससारखी विविध स्फोटके व प्रणोदक तयार करणारे कारखाने उभारले जात असून, त्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक प्रस्तावित आहे. दरवर्षी वीस हजार टन टीएनटी उत्पादनाची क्षमता येथे निर्माण होणार असून, सरकारी व खासगी क्षेत्रातील ही देशातील सर्वांत मोठी क्षमता ठरणार आहे. टीएनटी व आरडीएक्स निर्मितीचे कारखाने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून, त्यांचे उद्घाटन व सादरीकरण लवकरच होणार आहे.

शिर्डी येथे तयार होणाऱ्या तोफगोळ्यांमध्ये स्फोटके भरण्याचे महत्त्वाचे काम अहिल्यानगर येथील प्रस्तावित कारखान्यात केले जाणार आहे. सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे चार ते पाच हजार तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्याला संरक्षण क्षेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून, रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के.के. रेंजेस व मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे जिल्ह्याला आधीपासूनच संरक्षण क्षेत्रातील महत्त्व आहे. नव्या प्रकल्पांमुळे या ओळखीला अधिक बळ मिळणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. शिर्डी हे धार्मिक स्थळ असल्याने प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी हा प्रकल्प विशेष रासायनिक क्षेत्रात उभारण्यात आला आहे.

स्थानिक युवकांना रोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. रतन टाटा ट्रस्टच्या सहकार्याने औद्योगिक वसाहतीमध्ये विशेष इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात येत असून, त्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. एमआयडीसीकडूनही पन्नास कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राहाता येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतर एमआयडीसी परिसरात करण्यात आले असून, भविष्यातील विस्तारासाठी सुपे परिसरात संरक्षण विभागाच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर सुरू असल्याची माहितीही देण्यात आली.

या उद्घाटनाच्या निमित्ताने २३ व २४ मे रोजी विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या व शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. जिल्हाभरातून नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील व तरुणांसाठी संरक्षण क्षेत्रातील संधी जाणून घेण्याची ही मोठी संधी ठरणार असल्याचे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

उत्कृष्ट समाज घडवण्यासाठी ‘पंच परिवर्तना’ची गरज : अतुल अग्निहोत्री

उत्कृष्ट समाज घडवण्यासाठी ‘पंच परिवर्तना’ची गरज : अतुल अग्निहोत्री

श्रीरामपूर
 "राष्ट्राचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर केवळ विचार करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. आजचा समाज अधिक प्रगल्भ, संवेदनशील आणि सुदृढ बनवण्यासाठी 'पंच परिवर्तन' ही काळाची गरज आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री यांनी येथे केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 'संघशताब्दी मंथन - परिवर्तनाच्या दिशेने' या जिल्हास्तरीय प्रमुखजनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (ता. १७) श्रीरामपूर येथील निर्मळ संकुलात करण्यात आले होते. या वेळी मुख्य वक्ते म्हणून अतुल अग्निहोत्री ते बोलत होते. व्यासपीठावर संघाचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला (दिल्ली) आणि उत्तर अहिल्यानगरचे जिल्हा संघचालक किशोर निर्मळ उपस्थित होते.
अग्निहोत्री यांनी आपल्या संबोधनात पंच परिवर्तनातील सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, स्व-बोध (स्वत्वाचा भाव) आणि नागरी शिष्टाचार या पाच मुख्य सूत्रांवर प्रकाश टाकला. हे विषय केवळ उपदेशाचे नसून, दैनंदिन जीवनात आणि समाजात त्यावर प्रत्यक्ष कृती कशी करता येईल, याची उदाहरणे त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधत विविध शंकांचे निरसन केले.

ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला यांनी संघाच्या कार्यपद्धतीचा आणि विविध आयामांचा आढावा घेतला. भारतीय संस्कृतीतील 'वसुधैव कुटुंबकम्' या संकल्पनेचा संदर्भ देत त्यांनी देशाच्या उभारणीसाठी आणि प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने राष्ट्रकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

प्रारंभी, दीपप्रज्वलन आणि भारतमाता पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उत्तर अहिल्यानगरचे जिल्हा प्रचार प्रमुख मंगेश भिडे यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. श्रीरामपूर तालुका प्रचार प्रमुख महेश तारगे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. या 'शताब्दी मंथन' कार्यक्रमाला उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकार, संपादक, साहित्यिक, शास्त्रज्ञ, कलावंत, कायदेतज्ज्ञ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. प्रणव जोशी यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश भिडे यांनी आभार मानले. जिल्हा सह बौद्धिक प्रमुख विजयराव ढोले व वाद्यवृंदाच्या सामूहिक 'वंदे मातरम' गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

रविवार, १७ मे, २०२६

प्रथम भीमशब्द साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पदी साही. राजेंद्र फंड यांची निवड :

प्रथम भीमशब्द साहित्य संमेलनाचे  स्वागताध्यक्ष पदी साही. राजेंद्र फंड यांची निवड :

नाशिक 

                     तेजस बहूउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक यांचे वतीने  नाशिक येथील रमाई सभागृह डॉ. आंबेडकरनगर येथे एकदिवसीय प्रथम भीमशब्द साहित्य संमेलनाचे आयोजन दि. 31 में रोजी करण्यात आले असून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे सहसंपादक साही. राजेंद्र फंड यांची निवड केल्याची घोषणा तेजस बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. मेघा डोळस यांनी जाहीर केले आहे.
              तेजस या संस्थेबद्दल सांगायचे झाले तर   जिथे गरज, तिथे तेजस!जिथे वेदना, तिथे आधार!जिथे प्रतिभा, तिथे संधी! तसेच गरजू मुलांना अन्न, शिक्षण, आधार,नवोदित कलाकारांना रंगमंच,कवींना व्यासपीठआणि समाजाला दिशा देणे.हे काम साधं नाही, हे खऱ्या  अर्थाने “भीमकार्य” आहे! 
              आजच्या या संमेलनात नामवंत साहित्यिक प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित आहेत. त्यामध्ये संमेलनाध्यक्ष आचार्य श्री. शंकर अंदानी, दंगलकार कवी नितीन चंदनशिवे, उद्घाटक म्हणून समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त सौ. जयश्री सोनकवडे, आ. महेश हिरे, नगरसेवक राहुल दिवे, नगरसेविका सौ. सविता काळे व इतरही मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. 
                 साही. राजेंद्र फंड  हे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख असून गेल्या 15 वर्षापासून  ते " ग्रामसेवा संदेश " हा दिवाळी अंक प्रकाशित करतात. महाराष्ट्रभर त्यांचा दिवाळी अंकामुळे खूप मोठा  साहित्यिक परिवार आहे.  यांची या वर्षात महाराष्ट्रातील पुणे , कोल्हापूर, सातारा, भंडारा, वडाळा, निमगाव वाघा , श्रीरामपूर, दाभे मोहन, शिर्डी, अहिल्यानगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात व वेगवेगळ्या  ठिकाणी 5 वेळा संमेलनाध्यक्ष, दोन वेळा स्वागताध्यक्ष, 4 वेळा कविसंमेलनाध्यक्ष, एक वेळा विशेष एक वेळा विशेष अतिथी, एक वेळा पुस्तक प्रकाशन समारोह अध्यक्ष, 14 व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे आयोजक सदस्य होते. नुकतेच त्यांनी शिर्डी येथे आयोजित केलेले राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलन खूप गाजले आहे.
               त्यांच्या या निवडीबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष श्री राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव श्री. सुनील गोसावी व शब्दगंध परिवार, ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे संपादक डॉ. एकनाथराव ढाकणे, लायन्स क्लब ऑफ राहाताचे संस्थापक ला. विनोद गाडेकर, प्रेसिडेंट ला. सागर रोकडे, व्हाइस प्रेसिडेंट ला. डॉ. स्वाधीन गाडेकर, सेक्रेटरी ला. अमोल उगले, ट्रेझरर ला. सुनील धाडगे, डेबूजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुनील निकम, श्री. माधवराव देसाई, श्री. सुधाकर वाघ, अनिल देसाई, विलासराव रोकडे, रेशीमगाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल हुपरीकर, श्री. योगेश रोकडे, श्री महेश यादव, श्री. साईनाथ हजारे, श्री. कृष्णा शिंदे, सौ. सुषमा अमृतकर , सौ.सुनीता राक्षे यांनी अभिनंदन केले आहे.

शनिवार, १६ मे, २०२६

शनि जयंती व शनि आमवश्या निमित्त भर उन्हात ८लाख भाविकांनी घेतले शनि दर्शन.

शनि जयंती व शनि आमवश्या निमित्त भर उन्हात ८लाख भाविकांनी घेतले शनि दर्शन.

नेवासा ( प्रतिनिधी)-

दि. १६ शनि जयंती व शनि आमावश्या एकत्र येण्याचा योग २०१३ नंतर सुमारे १३ वर्षा नंतर जुळून आल्याने शनिशिंगणापूर येथे सुमारे ८लाख भाविकांनी शनि दर्शन घेतले. शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त झाल्याने प्रथम ६३वर्षानंतर शासन पातळीवर शनि जयंतीचे नियोजन केले गेले.

शनिवारी सकाळी ५वाजून ११मिनिटांनी शनि आमावश्या सुरुवात झाली असल्याने शुक्रवारी मध्यरात्री नंतरच भाविकांनी शनिशिंगणापूर येथे गर्दी केली होती. पहाटे ४.३० वाजता संभाजीनगरचे माजी खा.चंद्रकांत खैरे, श्रीनाथ भिमाले, पंकज पटेल यांच्या हस्ते प्रांत:आरती झाली.दुपारची आरती राकेश कुमार, सौरभ बोरा,सौरभ गाडगीळ व कावडी धारकांच्या हस्ते आरती झाली. सायंकाळीची आरती पद्मश्री झिम्बाबेचे उद्योगपती जयेश शहा यांच्या हस्ते झाली.तसेच दिवसभरात नांदेडचे आ.आनंदराव पाटील भोंढारकर, संगमनेरचे आ.अमोल खताळ,आ.विठ्ठलराव लंघे, खेडचे आ.बाबाजी काळे,माजी मंत्री शंकरराव गडाख, लोकनेते सुनिल गडाख आदीनीं शनिजयंती निमित्त शनि दर्शन घेतले.

शनि जयंती निमित्त शनिशिंगणापूर येथील युवकांनी काशी व प्रवरासंगम येथून आणलेल्या कावडीच्या पाणी शनि चौथऱ्यावर जाऊन अर्पण केले. तसेच झिम्बाबे येथील उद्योगपती जयेश शहा व मुंबई येथील व्यापारी सोनी साहेब यांनी शनिजयंती व आमवश्या निमित्त शनिशिंगणापूर येथे शनि मंदिरात विश्वशांती यज्ञाचे आयोजन केले होते.शनि जयंती निमित्त अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिवसभर शनि मंदिरात सुरक्षा व दर्शन व्यवस्था थांबून बघितली. शनि मंदिर परिसरात बाटल्या कचरा स्वतः उचलत त्यांनी स्वच्छता केली.अहिल्यानगर पोलीस दल, सोनई व शनिशिंगणापूर पोलीसांनीं दिवसभर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.शनिशिंगणापूर देवस्थानच्या वतीने कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी शनि जयंतीच्या यात्रेचे चोख नियोजन केले होते. शनि मंदिरात मंदिरात भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून गारव्यासाठी तुषार कारंजे सोडण्यात आले होते. शनिशिंगणापूर येथे हरियाणा, शिरसा,दिल्ली येथील शनिभक्तांनी शुक्रवारी रात्री व शनिवारी दिवसभर अन्नदान सेवा केल्याने देवस्थानचे भोजनालय बंद असल्याची उणीव भासली नाही.भाविकांना दिवसभर पिण्याचे पाणी, बॉटल, चहा, सरबत, नाश्ता व जेवनाची सोय केली होती.
देवस्थान प्रशासनाने प्रथमच खाजगी जमीनी मालकाशी समन्व्यय साधून मोफत पिण्याच्या पाण्याची सोय व विश्रांती कक्ष, वाहन तळ उभारले होते.सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दिवसभर आरोग्य पथक भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कार्यरत होते.
जनसंपर्क कार्यालयामध्ये दिवसभर येणाऱ्या भाविकांचे स्वागत जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले व पोलीस पाटील सयाराम बानकर यांनी केले.

चौकट -भुयारी दर्शन मार्गात पूणे येथील शनिभक्त अतुल धोत्रे यांना उन्हामुळे चक्कर आल्याने तातडीने प्रशासनाने त्या रुग्णाला उपचार केंद्रात दाखल केले. यानंतर देवस्थानचे माजी कोषाध्यक्ष दिपक दरंदले यांना लटकूच्या मोटार सायकलने धडक दिल्याने पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले

मोफत त्वचारोग तपासणी व उपचार शिबिराची सांगता उत्साहात

मोफत त्वचारोग तपासणी व उपचार शिबिराची सांगता उत्साहात

शिर्डी, 

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी तथा सुमुखा लक्ष्मी व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट, म्हैसूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय मोफत त्वचारोग तपासणी व उपचार शिबिराची आज उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.
दि. ११ ते १४ मे दरम्यान आयोजित या शिबिरामध्ये सुमारे १२०० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. विविध त्वचारोगांवरील सुमारे २५० प्रोसिजर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या. शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराच्या समारोपप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते सुमुखा लक्ष्मी ट्रस्ट, म्हैसूर येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शिवानी तसेच प्लास्टिक सर्जन डॉ. चंदन कुमार यांचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर श्री साईनाथ रुग्णालयातील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. दादासाहेब कांबळे, डॉ. श्रद्धा कोते आणि डॉ. विवेकानंद पाटील यांचाही उत्कृष्ट सेवेसाठी गौरव करण्यात आला.
“जागतिक नर्सिंग डे” निमित्त रुग्णसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा हॉस्पिटलमधील नर्सिंग स्टाफचा “फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रणाली सोमन, अनिता कडूस, सुरेखा गायकवाड, तेरेसा गायकवाड, प्रीतम कुमार बोधक, सिताराम डांगे, उषा बोधक, किरण धोटे, सारिका गावडे, सीमा आहेर, शारदा जाधव, निलेश गाडेकर, कविता पंडित आणि प्रसाद पाबळे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक अधिसेविका मंदा थोरात यांनी केले, तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले. यावेळी उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, सर्जन डॉ. राम नाईक, कार्यालयीन अधीक्षक काकासाहेब ढेमरे, अधिसेविका नजमा सय्यद यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी व नर्सिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुवार, १४ मे, २०२६

ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत दिनांक 23 मे 2026 रोजी होणार

शिर्डी  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि 'मेक इन इंडीया' या भारताच्या दूरदर्शी संकल्पनांना चालना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी औद्योगिक वसाहती मध्ये ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलांचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथसिंह  यांच्या उपस्थितीत दि.२३ मे २०२६ रोजी  होणार असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि निबे गृपचे गणेश निबे यांनी दिली.

शिर्डी औद्योगिक वसाहती मध्ये निबे गृपच्या माध्यमातून भारतातील खासगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादनाच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की,अत्यावश्यक संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांसाठी प्रगत उत्पादन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने शिर्डी येथील डिफेन्स क्लस्टर निर्माण होत आहे.

शिर्डीची भूमी भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय संगम आहे.श्री साईबाबांचा श्रध्दा आणि सबुरीचा संदेश आणि दुसरीकडे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अहील्यानगर जिल्हा संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे स्पष्ट करून, कार्यान्वित होणार्या प्रकल्पातून तीन हजार  रोजगार  निर्मिती होईल. यासाठी शिर्डीची निवड केल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे  आभार मानले.

निबे उद्योग समुहाचे गणेश निबे प्रकल्पाची माहीती देताना म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून आमच्या स्टार्टअपला मिळालेली संधी खूप मोठी आहे. शिर्डी येथील प्रकल्पात एक हाजार कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आतापर्यत  केली आहे.भविष्यात ही गुंतवणूक अधिक वाढेल.अत्याधुनिक प्रणालींचे डिझाइन, विकास, उत्पादन आणि एकत्रीकरण करणारी भारतातील आघाडीचा निबे गृप असून,शिर्डी येथील प्रकल्पातील  बाॅम्ब शेलच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि  बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमीपूजन संरक्षण मंत्री राजनाथसिंह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

शिर्डी येथील प्रकल्प राष्ट्रीय सुरक्षा अर्थिक विकास लघु सूक्ष्म उद्योगाचे सक्षमीकरण रोजागार निर्मीती आणि पर्यावरणीय जबाबदारी आशा एकात्मिक दृष्टिकोनातून कार्यान्वित होणार असून,प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने देशभरातील  विद्यार्थी, उदयोन्मुख अभियंते,लघु सूक्ष्म उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले उद्योजक यांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे गणेश निबे यांनी सांगितले.

मंगळवार, १२ मे, २०२६

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांसाठी संस्थानची मोफत निवासी एमएचटी-सीईटी कोचिंग योजना

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांसाठी संस्थानची मोफत निवासी एमएचटी-सीईटी कोचिंग योजना
              ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून नामांकित आकाश इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी (MHT-CET) कोचिंग उपक्रमाचा विस्तार करत संस्थानने आता महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांसाठी ही सुविधा पूर्णतः मोफत आणि निवासी स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
            आर्थिक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन संस्थानने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम सुरू केला आहे. या योजनेंतर्गत इयत्ता दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत निवासी एमएचटी-सीईटी कोचिंगचा लाभ दिला जाणार आहे.
               संस्थानच्या वतीने विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलण्यात येणार असून, श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, शिर्डी येथे सुरू असलेल्या आकाश इन्स्टिट्यूटच्या अनुभवी तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन दिले जाईल. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा आणि अभ्यासपूरक वातावरणही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
            या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, शिर्डी येथे प्रवेश घेणे आवश्यक राहणार आहे. या योजनेमुळे राज्यातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी आदी तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांची प्रभावी तयारी करण्याची संधी मिळणार असून त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमाचा जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

रविवार, १० मे, २०२६

आनंदवन सेवाभावी संस्थेचे पसायदान पुरस्कार जाहीर स्व. सोपानराव दरंदले पत्रकार रत्न पुरस्कार सूर्यकांत नेटके यांना जाहीर

आनंदवन सेवाभावी संस्थेचे पसायदान पुरस्कार जाहीर 

स्व. सोपानराव दरंदले पत्रकार रत्न पुरस्कार सूर्यकांत नेटके यांना जाहीर 

नेवासा 
: सोनई येथील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारे 'पसायदान' पुरस्कार पंढरीनाथ महाराज वारकरी संस्थेचे पंढरीनाथ महाराज तांदळे, आरोग्य विषयी जागतिक स्तरावर कार्य असलेले डाॅ. संजय सोनवणे, साई आदर्श संस्थेचे संस्थापक शिवाजीराव कपाळे यांना जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष स्व. सोपानराव दरंदले यांची स्मृती जागृत रहावी म्हणून सुरु करण्यात आलेला दुसरा 'पत्रकार रत्न पुरस्कार' दैनिक अ‍ॅग्रोवनचे जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत नेटके यांना देण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव संजय गर्जे व गोविंद महाराज निमसे यांनी दिली.

पसायदान आनंदवन संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार दि.  १२ मे२०२६  रोजी ध्यानमंदीर प्रांगणात सायंकाळी ६ वाजता नेवासा येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उध्दव महाराज मंडलिक व शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. महिला बचत गटाच्या मार्गदर्शिका सुनीताताई गडाख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
विद्यार्थीदशेत विशेष शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त डाॅ. देवयानी रविंद्र ससाणे, ओंकार नितीन दरंदले व मृदंग वादनात देशपातळीवर बक्षीस घेतलेल्या प्रसाद महाराज तरवडे यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष उदय पालवे व उपाध्यक्ष विनायक दरंदले यांनी केले आहे.

शनिवार, ९ मे, २०२६

एकीचे बळ आणि लोकसहभागातून पानेगांवात अवतरली विकासगंगा.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान; पानेगांवची समितीकडून पाहणी

एकीचे बळ आणि लोकसहभागातून पानेगांवात अवतरली विकासगंगा.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान; पानेगांवची 
समितीकडून पाहणी
पानेगांव 

- नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे दि.८ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज
अभियान योजनेत पानेगांव ग्रामपंचायतीने गेल्या वर्षभरात केलेल्या विविध विकासकामांची, तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमांची अधिकाऱ्यांच्या समितीने  प्रत्यक्ष पाहणी केली.
बीड जिल्ह्यातील माजलगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ज्योत्स्ना मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ढाले, विस्तार अधिकारी गायकवाड यांच्या समितीने विविध कामांची तपासणी केली.
यावेळी नेवासे पंचायत समितीचे अतिरिक्त गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार, शेळके भाऊसाहेब उपस्थित होते. सप्टेंबर पासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात पानेगांव ग्रामपंचायतीने सुशासनयुक्त पंचायत, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, लोकसहभाग व
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पानेगांव येथील विकासकामांची पाहणी करताना समितीचे अधिकारी व ग्रामस्थ.
श्रमदानातून लोकचळवळ निर्माण झाली.
जलसमृद्ध, वृक्षारोपण आणि संवर्धन स्वच्छ व हरित गाव निर्मितीसोबतच  सक्षम ग्रामपंचायत, उपजीविका विकास, सामाजिक न्याय आणि नावीन्यपूर्ण
उपक्रम या घटकांचा सूक्ष्म अभ्यास करून ग्रामविकासाचा मजबूत पाया उभारण्यात आला. शासकीय इमारती बरोबरच वृक्षांना रंगरंगोटी, स्वच्छ माझे अंगण, समृद्ध माझे गाव, स्त्री जन्माचे स्वागत, यांसारख्या योजना पानेगांवात राबविण्यात येत आहे. 
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुक्यातील जवळपास २२ गावांनी सहभाग नोंदवला. यात पानेगांव  गाव अग्रेसर असून, १९९९ साली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी घेवून राज्यस्तरीय पुरस्कार मध्ये निवड झाली होती.त्याच पद्धतीने यावेळी हि ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या माध्यमातून आपल्या गावाला राज्य शासनाचे बक्षीस मिळवून देण्यासाठी गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करीत आहेत. पानेगांव बरोबरच तालुक्यातील सहभाग घेतलेल्या  विकासकामांचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
नाविन्यपूर्ण उपक्रमांचे अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक करुन गावात असणारे जवळपास दोन हजार झाडांचे वृक्षारोपण आणि संवर्धन, मियावाकी झाडांचे यशस्वी संवर्धन, मंदिर जिर्णोद्धार वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी अद्यावत वाचनालय, गावातील सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसंसद सुसज्ज आकर्षक मोक्षधाम गावातील स्वच्छतेबरोबरचं, डिजिटल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डिजिटल अंगणवाड्या, भव्यदिव्य असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा 
पानेगांवकरांचा एकोपा, आणि लोकसहभाग,व प्रशासनाचा दूरदृष्टिकोनातून तालुका स्तरावरील व ग्रामस्तरावरील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन राजकिय विरहित वातावरण दाखवलेली एकजूट प्रेरणादायी ठरत आहे. यावेळी पानेगांव माजी लोकनियुक्त सरपंच संजय जंगले, विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ निकीता भोसले/आंबेकर उपसरपंच सुरेश जंगले ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे आदीं सह येथील पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी,आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक वृंद, अंगणवाडी आशासेविका  ग्रामस्थ उपस्थित होते.
----प्रतिक्रिया - छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याने ओळख निर्माण होत असलेल्या पानेगावात एकोप्याने १९९९ साली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यापासून गावात लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील यांनी विकासकामांना गती दिली असून डिजिटल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल अंगणवाड्या बरोबरच गावातील मंदिर जिर्णोद्धार, वृक्षारोपण व संवर्धन, वाचनसंस्कृती, वाळू संवर्धन सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय हे सर्व पाहणी करण्यासाठी आसपासचे ग्रामस्थ पाहणी करण्यासाठी येत आसतात यावेळी हि नक्कीच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात निवड होईल-
 संजय जंगले माजी लोकनियुक्त सरपंच पानेगांव (ता 
नेवासे)

गुरुवार, ७ मे, २०२६

नामदार डॉ उदय सामंत मंत्री उद्योग यांनी साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले

मा. ना. डॉ. उदय सामंत, मंत्री उद्योग, मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर  श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी आ. अमोल खताळ उपस्थित होते.

सोमवार, ४ मे, २०२६

मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनचा ‘रक्त संवाद’ उपक्रम

“मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनचा ‘रक्त संवाद’ उपक्रम:

 श्री साईबाबा संस्थान प्रसादालय, शिर्डी  ते राहाता नगरपरिषद, पंचायत समिती राहाता व बौद्ध विहार राहाता पर्यंत ऐतिहासिक झेप; सॅनिटरी पॅड वितरणातून महिलांच्या सन्मानाची बुलंद नोंद“रक्त संवादातून आरोग्याचा संदेश: १५,००० सॅनिटरी पॅड वितरणातून महिलांच्या सन्मानाचा विचारप्रवर्तक प्रवास”
राहाता तालुक्यात महिलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाच्या दृष्टीने एक संवेदनशील पण अत्यंत आवश्यक विषयाला केंद्रस्थानी ठेवत Manomay Healing Heart Foundation यांच्या वतीने राबविण्यात आलेला ‘रक्त संवाद’ उपक्रम एक वेगळीच सामाजिक दिशा दाखवणारा ठरत आहे.
मासिक पाळी हा स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक आणि अपरिहार्य भाग असला तरी, आजही समाजात त्याबाबत संकोच, गैरसमज आणि अज्ञान मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अनेक ठिकाणी महिलांना योग्य साधनांचा अभाव, स्वच्छतेबाबत अपुरी माहिती आणि सामाजिक दबावामुळे त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत ‘रक्त संवाद’ हा उपक्रम केवळ सॅनिटरी पॅड वितरणाचा कार्यक्रम न राहता, विचारांना चालना देणारा, संवादाला दिशा देणारा आणि आत्मविश्वास निर्माण करणारा प्रयत्न ठरत आहे.

या उपक्रमांतर्गत एकूण १५,००० सॅनिटरी पॅडचे मोफत वितरण करण्यात आले. परंतु या आकड्यापलीकडे जाऊन पाहिले, तर हा उपक्रम हजारो महिलांच्या मनात “मी या विषयावर बोलू शकते” ही भावना निर्माण करणारा ठरला—आणि हीच त्याची खरी ताकद आहे.
 1. श्री साईबाबा संस्थान प्रसादालय – मोठ्या प्रमाणातून निर्माण झालेला विचाराचा विस्तार
Shri Saibaba Sansthan Trust च्या प्रसादालय येथे पार पडलेला उपक्रम हा या मोहिमेचा सर्वात मोठा आणि प्रभावी टप्पा ठरला. येथे ११,००० सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे हजारो महिलांपर्यंत थेट पोहोच साधली गेली.
मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री गोरक्ष गाडीलकर, उपकार्यकारी अधिकारी मा. श्री दराडे, प्रशासकीय अधिकारी मा. श्री अतुल वाघ, प्रसादालय विभाग प्रमुख श्री संजय शिंदे व श्री रवींद्र गायके श्री तुषार पगार (संभाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.
या ठिकाणी एक महत्त्वाचा बदल जाणवला—महिलांनी प्रथमच सार्वजनिक ठिकाणी मासिक पाळीबाबत मोकळेपणाने संवाद साधण्यास सुरुवात केली. श्रद्धेच्या ठिकाणी उभा राहून जेव्हा आरोग्याचा विषय मांडला जातो, तेव्हा तो अधिक प्रभावीपणे लोकांच्या मनात रुजतो, हे या उपक्रमातून स्पष्ट झाले.
फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. येलम यांच्या नेतृत्वाखाली
डॉ. संकेत येलम, श्री किरण वाणी, श्री ललित मुनावत, श्री प्रतीक आढाव, कु. राजेश्वरी, श्री सागर जाधव, श्री निखिल पर्बत, कु. कोमल राजपूत, कु. सुमय्या शेख,  कुमारी  पल्लवी नरारे  , लक्षित पिपाडा,श्री राहुल निकाळे  अमोल ठोकळे व इतर सदस्यांनी मनापासून सहभाग घेतला.

या उपक्रमाने एक गहन विचार समोर आणला —
मोठ्या प्रमाणावर केलेली कृती फक्त संख्या वाढवत नाही, तर समाजाच्या विचारविश्वात बदलाची बीजे पेरते.
 2. राहाता नगरपरिषद – दैनंदिन व्यवस्थेतून उगवलेली संवेदनशीलता
राहाता नगरपरिषद येथे नगराध्यक्ष मा. डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन एक संवेदनशील संदेश देणारा ठरला.
महिला कर्मचाऱ्यांना सॅनिटरी पॅडचे वितरण करताना, त्यांच्याशी साधलेला संवाद अधिक महत्त्वाचा ठरला. कामाच्या धकाधकीत अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या विषयावर महिलांनी मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळाली.
नगरसेवक मा. श्री बोरकर व इतर कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने कार्यालयीन वातावरणातही एक सकारात्मक बदल घडवून आणला.
येथे एक विचार प्रकर्षाने जाणवला —
समाजातील मोठे बदल हे नेहमी मोठ्या व्यासपीठांवरच घडतात असे नाही; ते दैनंदिन जीवनातील छोट्या, पण अर्थपूर्ण कृतीतूनही घडतात.
फाउंडेशनच्या टीमने येथे महिलांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगत आत्मविश्वासाने स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक राहण्याची प्रेरणा दिली.
 3. पंचायत समिती राहाता – प्रशासनातून जागरूकतेचा विस्तार
पंचायत समिती राहाता येथे BDO मा. श्री विवेक गुंड, शिक्षणाधिकारी मा. श्री राजेश पावशे व इतर अधिकारी वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
येथे विविध विभागांतील महिला कर्मचाऱ्यांना सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले. त्यासोबतच मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या शारीरिक बदलांबाबत, स्वच्छतेच्या सवयींबाबत आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या संवादातून महिलांमध्ये जागरूकता निर्माण झालीच, पण प्रशासनाच्या माध्यमातून हा संदेश समाजाच्या अधिक व्यापक स्तरावर पोहोचू शकतो, ही जाणीवही निर्माण झाली.
या उपक्रमाने अधोरेखित केलेला विचार असा —
जेव्हा प्रशासन संवेदनशीलतेने काम करते, तेव्हा ते केवळ योजना राबवत नाही, तर समाजाच्या मानसिकतेत बदल घडवते.
हा उपक्रम प्रशासन आणि समाज यांच्यातील नात्याला अधिक मानवी आणि जवळचा बनवणारा ठरला.
 4. बौद्ध विहार – सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर परिवर्तनाची नांदी
महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा या निमित्ताने बौद्ध विहार येथे पार पडलेला कार्यक्रम सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर जागरूकतेचा संदेश देणारा ठरला.
या कार्यक्रमात डॉ. येलम यांच्या नेतृत्वाखाली
श्री आदित्य काकड, सौ. स्नेहल आदित्य काकड, श्री रमेश निकाळे, श्री अशोक निकाळे, श्री राहुल निकाळे, श्री शशिकांत कांबळे, श्री थोरात सर व इतर सदस्य उपस्थित होते.
धार्मिक आणि सामाजिक वातावरणात महिलांच्या आरोग्याचा विषय मांडल्यामुळे या उपक्रमाला एक वेगळे परिमाण प्राप्त झाले. येथे केवळ वितरण न होता, महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक राहण्याची आणि स्वतःच्या सन्मानासाठी उभे राहण्याची प्रेरणा देण्यात आली.
या ठिकाणी उमटलेला विचार असा —
परंपरा आणि परिवर्तन यांचा समतोल साधला, तरच समाज खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकतो.विचार, संवाद आणि परिवर्तनाचा प्रवास
‘रक्त संवाद’ हा उपक्रम केवळ सेवा कार्य नाही—तो एक विचारप्रक्रिया आहे.
✔️ महिलांच्या आरोग्याबाबत मोकळेपणाने संवाद
✔️ सामाजिक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न
✔️ स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे
✔️ आत्मविश्वास आणि सन्मान वाढवणे
आज १५,००० सॅनिटरी पॅडचे वितरण झाले, परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे हजारो महिलांच्या मनात निर्माण झालेली जागरूकता, आत्मविश्वास आणि स्वतःच्या आरोग्याबद्दलची जबाबदारी.
Manomay Healing Heart Foundation यांच्या या उपक्रमाने राहाता तालुक्यात एक सकारात्मक विचाराची पायाभरणी केली आहे.
“संवाद सुरू झाला की परिवर्तनाची प्रक्रिया आपोआप सुरू होते—आणि तो संवाद जितका प्रामाणिक, तितकं परिवर्तन अधिक गहिरे.”

रविवार, ३ मे, २०२६

सराफ अदापुरेला सह आरोपी करा,अन्यथा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे उपोषणाचा इशारा- सौ.बडाख

सराफ अदापुरेला सह आरोपी करा,अन्यथा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे उपोषणाचा इशारा- सौ.बडाख 
 
नेवासे-
 सराफ भागवत मधुकर अदापुरेला सह आरोपी करा अन्यथा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे उपोषण करण्याचा इशारा करजगांव (ता. नेवासे) येथील सौ.मिनाताई ज्ञानदेव बडाख यांनी दिला असून हकिकत अशी कि, सौ.बडाख ह्या ७ एप्रिल २०२६ रोजी  पुणे–पाथर्डी एस.टी बसने अहिल्यानगरकडे प्रवास करत असताना शिरूर (जि. पुणे) येथे दोन अनोळखी महिला बसमध्ये चढल्या. त्यापैकी एक महिला त्यांच्या शेजारी येऊन बसली. काही वेळाने झोप लागल्यानंतर त्या महिलांनी संधी साधून बडाख यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने चोरून नेले.
अहिल्यानगर बसस्थानकावर उतरल्यावर हा प्रकार लक्षात येताच बडाख यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्परतेने तपास करत माया कल्याण भोसले (रा. हादगाव, ता. शेवगाव) हिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली देत चोरीचे सोने बोधेगाव येथील सराफ दुकानदार भागवत मधुकर आदापुरे याला विकल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी संबंधित सराफाकडून कायदेशीर पंचनामा करून चोरीचे सर्व सोने जप्त केले. त्यामुळे पीडित महिलेला दिलासा मिळाला.
मात्र, या प्रकरणात चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफावर  गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे. 
चोरांकडून सराफांनी सोने खरेदी करणे थांबवले, तर अशा प्रकारच्या चोरीच्या घटना कमी होतील,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.
सौ.बडाख यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात सराफ भागवत आदापुरे यांना देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे, व अशा सराफांना पाठीशी घालणाऱ्या सराफ संघटनेच्या पदाधिकारी यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
 अहिल्यानगर- बस प्रवासादरम्यान चोरी गेलेल्या तब्बल २२ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा गुन्हा उघडकीस आणत कोतवाली पोलिसांनी तात्काळ व प्रभावी कारवाई करत चोरीचा तपास पूर्ण केला २५लाख किंमतीचे २०तोळे सोनं जप्त करण्यात यश मिळाले .या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे. 
दरम्यान, कोतवाली पोलिसांच्या जलद आणि निष्पक्ष तपासामुळे चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीला आणला या प्रकरणातील चोरीचे सोने घेणारे सराफ यांच्या बाजूने सुवर्णकार समितीचे पदाधिकारी उमेश बुऱ्हाडे यांनी उलट कोतवाली पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी करत मागील काही दिवसापासून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केलेले आहे. त्या अनुषंगाने उमेश बुऱ्हाडे  व त्यांचे पदाधिकारी यांच्या विषयी माहिती घेता, हे लोक सातत्याने ज्या-ज्या ठिकाणी पोलीस अशा चोरीचे सोने घेणाऱ्या  सराफांकडून सोने जप्तीची कारवाई करीत असतात, अशावेळी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रवेश करून संबंधित सराफ यांना चुकीच्या  पद्धतीने मार्गदर्शन करून व वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करून संबंधित सराफांनी सोने जप्ती देऊ नये म्हणून प्रयत्न करत असतात, अशा स्वरूपाची प्रेस नोट देखील सातारा पोलिसांनी यापूर्वीच प्रसिद्ध केलेली आहे. तसेच वालचंदनगर पोलिस स्टेशन येथे पण कायदेशीर प्रक्रियेने चोरीचे सोने तेथील पोलिसांनी हस्तगत केले असता सदर ठिकाणी जाऊन पोलिसांचा कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केले बाबत नोंदी आहेत.याशिवाय सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि इतर विविध ठिकाणी उमेश बुऱ्हाडे व त्याचे साथीदार यांनी सोने जप्तीला चुकीच्या पद्धतीने विरोध करण्याचा पायंडा पाडला आहे. 
----प्रतिक्रिया---- 
वास्तविक पाहता माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी पोलीस व सुवर्णकार यांच्यामध्ये सुसंवाद असावा आणि सोने जप्तीची कारवाई सुलभ व्हावी, याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात कार्यालयीन आदेश काढून त्यामध्ये सुवर्णकार दक्षता समिती सदस्य म्हणून प्रतिष्ठित अशा सुवर्णकार बांधवांची नियुक्ती केलेली आहे. त्यामध्ये संबंधित उपोषणकर्ते  यांची व त्यांच्या संघटनेची कोणतीही नोंद नाही. असे असताना देखील कोणत्यातरी विशिष्ट हेतूने उपोषणकर्ते अशा प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक प्रवेश करून चुकीच्या पद्धतीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत. त्यामुळे इतर सुवर्णकार बांधवांनी याबाबत सखोल माहिती घ्यावी आणि केवळ उपोषणकर्ते ज्या पद्धतीने निवेदन करत आहेत,केवळ त्यावर विश्वास ठेवून कोणतेही पाऊल उचलू नये. अशा स्वरूपाची मतं आता अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांची झालेली आहे 
-सुहास टेमक -
सामाजिक कार्यकर्ते

शुक्रवार, १ मे, २०२६

गाडगेबाबा साहित्य संमेलनात पुरस्कारार्थी यांच्या काढलेल्या टपाल तिकिटाची दखल रिजन पोस्ट ऑफिसने घेतली.

गाडगेबाबा साहित्य संमेलनात पुरस्कारार्थी यांच्या काढलेल्या टपाल तिकिटाची दखल  रिजन पोस्ट ऑफिसने घेतली.
शिर्डी : 
 राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलन दि. 26 एप्रिल रोजी शिर्डी येथे हॉटेल जे. के. पॅलेस येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून साहित्यिकांनी हजेरी लावली. याचे कारण म्हणजे संमेलनापूर्वी महाराष्ट्रभरातून  शंभरावर वर्तमानपत्राने या संमेलनाचे वार्तांकन केल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर या संमेलनाचा प्रचार प्रसार झाला.
           या संमेलनात दोन कवी संमेलने, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विभिन्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना राष्ट्रसंत डेबूजी संत गाडगेबाबा सन्मान पुरस्कार तसेच साहित्य, समाजरत्न , शिक्षकरत्न, कविरत्न, ग्रामसेवारत्न, उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष साही. राजेंद्र फंड यांच्या संकल्पनेतून पुरस्कारार्थी यांना गाडगेबाबा मूर्ती, सन्मान चिन्ह यासोबत पुरस्कारार्थी यांचे भारतीय पोस्ट विभागाच्या सौजन्याने माय स्टँप अंतर्गत पुरस्कारार्थीचे खास टपाल तिकीट काढण्यात आले. यामुळे या पुरस्काराचे हे वेगळे आकर्षण होते. त्यामुळे याची चर्चा वर्तमानपत्रे, व्हॉटस् ऍप, फेसबुक द्वारे मोठ्या प्रमाणात झाली. एकाच वेळी माय स्टँप अंतर्गत 28 व्यक्तींचे टपाल तिकीट काढून त्याचे भारतीय डाक विभागाचे इन्स्पेक्टर श्री. अनंत सोनवणे व योगेश शेजवळ यांच्या उपस्थितीत त्या टपाल तिकिटांचे समारंभपूर्वक  विमोचन करण्यात आले.
                 याची वर्तमानपत्रामधील बातमी राहाता, कोपरगांव येथील पोस्ट ऑफिसमधून पुणे रिजन ऑफिस ( डायरेक्टरेट ऑफ  पोस्ट ऑफिस) मधील उच्चस्तरीय डी. पी. एस.ऑफिसर 
श्री. अभिजित बनसोडे सो. व उच्चस्तरीय पी.एम. जी. ऑफिसर श्रीम. प्रीती अग्रवाल मॅडम यांना बातमीचे कात्रण गेले. त्यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व उपक्रमाची माहिती तसेच ज्यांचे सन्मानपूर्वक टपाल तिकीट काढण्यात आले त्या सर्वांची माहिती मागवली. तसेच या संमेलनाचे आयोजक संमेलनाध्यक्ष तथा डेबूजी प्रतिष्ठाणचे संस्थापक श्री. राजेंद्र फंड, अध्यक्ष श्री. सुनील निकम, कवी सरकार वाचनालयाचे अध्यक्ष श्री. कवी सरकार, आयोजक श्री. माधवराव देसाई, श्री. सुधाकर वाघ, श्री. अनिल देसाई, श्री. विलासराव रोकडे, सौ. राजश्री फंड यांचे पोस्ट विभागाचा हा उपक्रम आकर्षक पद्धतीने राबविल्याबद्दल अभिनंदन केले.

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...