शनिवार, २३ मे, २०२६

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

 
शिर्डी, 

संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योगांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कंपन्यांकडून होणारे संशोधन हे संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांना अधिक मजबूत करीत असल्याने केंद्र सरकारनेही खासगी उद्योगांना पाठबळ देऊन सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. खासगी उद्योगाचे सामर्थ्य जेवढे वाढेल तेवढी सुरक्षा अधिक मजबूत होईल. यातून भारत देश संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये 'निबे उद्योग समूहा'च्या वतीने विकसित करण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन आणि सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, लेफ्टनंट जनरल संदीप जैन, अनुप सिंघल, डीआरडीओचे सेक्रेंटरी डॉ.समीर कामत, केंद्रीय सचिव संजीव कुमार, ब्रह्मविहारीजी महाराज, आ.राणाजगजितसिंह, आ.मोनिका राजळे, आ. विक्रमसिंह पाचपुते, आ.आशुतोष काळे, आ.अक्षय कर्डिले यांच्यासह संरक्षण आणि उद्योग विभागाचे अधिकारी आणि प्रकल्पाचे प्रवर्तक गणेश निबे उपस्थित होते.

आपल्या भाषणात गणेश निबे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख करून मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "येथे आल्यानंतर या प्रकल्पाचे महत्त्व आपल्याला समजले. भारतामध्ये बुद्धिमत्तेची कमतरता नाही. असलेल्या साधनांचा उपयोग करून, बुद्धिमत्तेच्या जोरावर भारत देशाला निर्यातदार होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही." हे स्पष्ट करून त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. सुशासन आणि स्वाभिमानाचा संदेश त्यांनी आपल्याला दिला. आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेचे मॉडेल शिवाजी महाराजांनी निर्माण करून दाखविले. लढाईसाठी लागणारे साहित्यही त्यांनी स्‍थानिकांकडून बनवून नवे साम्राज्य उभे करून दाखविले. हीच भूमिका लोकमान्य टिळकांची होती. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हा संदेश देणाऱ्या या महाराष्ट्राच्या भूमीने आता संरक्षण व्यवस्थेतही खासगी उद्योगांच्या माध्यमातून एक नवा विश्वास निर्माण केला आहे.

संरक्षण उद्योग मजबूत होण्यासाठी खासगी उद्योगाला केंद्र सरकारने पाठबळ देण्याचे धोरण घेतले आहे. यामुळे धोरणात्मक सुधारणा होत असून थेट परकीय गुंतवणुकीसही प्रोत्साहन मिळत आहे. परवाना प्रक्रियेचे सुलभीकरण आणि स्वदेशी नीतीला चालना मिळत असल्यामुळेच खासगी उद्योग समूहांचा सहभाग संरक्षण उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढला आहे. हा वाटा आता २५ ते ३० टक्क्यांवर पोहोचला असल्याचे त्यांनी सांगितले.  आधुनिक तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्तेचा वापर करून, खासगी उद्योग समूह करीत असलेली वाटचाल ही ऊर्जा निर्माण करणारी असून, यातूनच विकासाचा रोडमॅप तयार होत आहे. निबे उद्योग समूह यासाठीचे मोठे उदाहरण असून, या उद्योग समूहातून निर्माण होणारे संरक्षण साहित्याचे उत्पादन पाहता हा उद्योग समूह देशासाठी अनेक वर्षांचा माईलस्टोन ठरेल.

भारताचे सामर्थ्य हे आता शिर्डीच्या भूमीतूनही सिद्ध होणार आहे. हा उद्योग केवळ उत्पादनासाठी मर्यादित नाही, तर यातून अर्थव्यवस्था मजबूत होईलच, पण औद्योगिक स्थिरताही मिळेल. अनेक खासगी कंपन्या आता संरक्षण उत्पादनामध्ये भागीदारी करण्यासाठी पुढे येत असल्यामुळे एक 'इको सिस्टिम' निर्माण होत असून, संरक्षण उद्योगही मजबुतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. 'ऑपरेशन सिंदुर मध्ये भारताने आपले सामर्थ्य सिद्ध करून दाखविले आहे. भविष्यातही खासगी क्षेत्राच्या माध्यमातून संरक्षण उत्पादनाची निर्मिती चांगल्या पद्धतीने होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "आजचा दिवस देशाकरिता ऐतिहासिक असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' हे जे संदेश दिले होते, ते संरक्षण क्षेत्राने प्रत्यक्षात अमलात आणले आहेत. त्यामुळे देश आता स्वदेशी पद्धतीने बनविलेल्या उत्पादनांचा निर्यातदार बनला आहे." राज्यात चार डिफेन्स कॉरिडॉर तयार करण्यासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे. यामुळे आता महाराष्ट्र राज्य संरक्षण उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर येथे संरक्षण उद्योग समूह विकसित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. "गणेश निबे यांच्यासारखे युवक या क्षेत्रात करीत असलेले काम भूषणावह आहे. नवीन तंत्रज्ञान आणून देशासाठी काहीतरी निर्माण करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे. आत्मनिर्भर भारताकरिता नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम 'निबे उद्योग समूह' करीत आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

याप्रसंगी गणेश निबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आभार मानले. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या संरक्षण उत्पादनाच्या प्रदर्शनाला संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. निबे उद्योग समुह आणि विविध अंतराष्‍ट्रीय कंपन्‍यांमध्‍ये महत्‍वपूर्ण करार करण्‍यात आले. ऑप्‍टीकल सॅटेलाईट आणि ब्‍लॅक स्‍काय कंपनी तसेच सीप्‍लेन निर्मितीसाठी कॅनेडीयन कंपनी हॅवीलॅन्‍ड सोबत स्‍वाक्षरी करण्‍यात आली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. उद्घाटन सोहळ्यापूर्वी भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलांच्या लेफ्टनंट जनरलनी विद्यार्थी, नागरिक आणि विज्ञानप्रेमींशी संवाद साधला.

शुक्रवार, २२ मे, २०२६

तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण प्रकरणी आरोपी शरद पवार यांचा जामीन अर्ज फेटाळला

तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण प्रकरणी आरोपी शरद पवार यांचा जामीन अर्ज फेटाळला

अहील्यानगर 

खासदार निलेश लंके यांच्या सोशल मिडियाचे काम करणाऱ्या किशोर महादेव परभणे यांना अमानूष मारहाण  केल्‍याच्‍या कारणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेला चिंचोडी पाटीलचा सरपंच आणि खासदार निलेश लंके समर्थक आरोपी शरद खंडू पवार याचा जामिन अहिल्‍यानगर येथील अतिरिक्त मुख्‍य न्‍याय दंडाधिकारी श्री एस आर शिंदे  यांनी फेटाळला आहे.

   सोशल मिडीयावर व्‍हीडीओ पोस्ट केल्‍याचे कारणाने किशोर महादेव परभणे यांचे अपहरण करुन, त्‍यांना खोलीत डांबून ठेवत अमानुष मारहान केल्‍याची घटना घडली होती. त्‍यांनी दिलेल्‍या फिर्यादीवरुन प्रणव विजय मोरे, शरद खंडू पवार, मारुती देवराम कोकाटे यांच्‍यावर ४ मे २०२६ रोजी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्‍याबाबत सोशल मिडीयावर व्‍हीडीओ पोष्‍ट केल्‍याच्या रागातून अपहरण आणि मारहाणीची घटना घडली होती.

      या घटने संदर्भात पोलिसांनी शरद खंडू पवार यास अटक करुन, अहिल्‍यानगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री एस आर शिंदे  यांच्या  न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने त्‍यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. पवार हा कोठडीत असताना तपासी अधिका-यांना या संदर्भात उडवा उडवीचे उत्‍तर देत समाधानकारक माहीती न दिल्‍याने पोलिसांनी त्‍यास पुन्‍हा न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने त्‍याची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत केली. 

जामीन मिळावा म्‍हणून, शरद खंडू पवार याने न्‍यायालयात प्रयत्‍न केले होते. याबाबतची सुनावणी अहिल्‍यानगर येथील अतिरिक्‍त  न्‍यायदंडाधिकारी श्री एस आर शिंदे कोर्ट क्रमांक 17 यांच्‍यासमोर झाली. मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड.आनंद व्‍यवहारे यांनी बाजू मांडली तर, सरकार पक्षाच्‍या वतीने अॅड. धैर्यशील उर्फ अजित लक्ष्‍मण वाडेकर यांनी बाजू मांडून शरद पवार यांच्‍या जामीण अर्जास विरोध केला.

       न्‍यायालयाने दोन्‍हीही बाजूचा युक्‍तीवाद ऐकून घेतल्‍यानंतर शरद खंडू  पवार याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता या घटनेत शरद खंडू पवार याच्‍या चौकशीतून बरेच कारनामे समोर येण्‍याची शक्‍यता आहे.

गुरुवार, २१ मे, २०२६

शिर्डी मध्ये २३ ते २४ मे रोजी संरक्षण उत्पादनाच्या प्रदर्शानाचे आयोजन विद्यार्थी नागरिकांना राॅकेट आणि क्षेपणास्त्र पाहाण्याची संधी!

शिर्डी मध्ये २३ ते २४ मे रोजी  संरक्षण उत्पादनाच्या प्रदर्शानाचे आयोजन

 विद्यार्थी नागरिकांना राॅकेट आणि क्षेपणास्त्र पाहाण्याची संधी!


शिर्डी, 

 शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या  उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने २३ आणि २४ मे २०२६ रोजी विद्यार्थी आणि नागरीकांसाठी  संरक्षण साहीत्याच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये  राॅकेट आणि क्षेपणास्त्र विशेष आकर्षण असणार आहेत.
 देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सावळीविहीर येथील औद्यगिक वसाहती मध्ये निबे गृपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहाणार आहेत. अहील्यानगर जिल्हयात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या प्रकल्पामुळे  अहील्यानगर जिल्हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून भविष्यात ओळखला जाईल.या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफ गोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार असून, प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची आहे.संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान व कच्चा माल स्वदेशी आहे. हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभारण्यात आला आहे. 

शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून  यामध्ये रॉकेट लाँचर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन व विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. 

 उद्घाटनाच्या निमित्ताने २३ व २४ मे रोजी सकाळी साडेदहा ते पाच या वेळेत विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या व शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.यासाठी मोठे स्टाॅल प्रकल्पस्थळावर उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी  विज्ञानप्रेमी, नागरिक, महीला  या प्रदर्शनाला भेट देतील व तरुणांसाठी संरक्षण क्षेत्रातील संधी जाणून घेण्याची ही मोठी संधी निर्माण करुन देण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याला संरक्षण क्षेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून, रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के.के. रेंजेस व मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे जिल्ह्याला आधीपासूनच संरक्षण क्षेत्रातील महत्त्व आहे. संरक्षण उत्पादन प्रकल्पामुळे या ओळखीला अधिक बळ मिळणार आहे.

बुधवार, २० मे, २०२६

१७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण

१७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण


अहिल्यानगर 

 शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटन २३ मे रोजी सकाळी १० वा. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण व कृषी मंत्री दत्तात्रय विठ्ठल उर्फ दत्ता मामा भरणे यांच्या शुभहस्ते हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्रामभैय्या जगताप,महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतराव डांगे, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे,१६ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष  संपतदादा बारस्कर,१६ वे संमेलनाध्यक्ष डॉ.संजीवनीताई तडेगावकर, माजी संमेलनाध्यक्ष व माजी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर व संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. संदीप सांगळे हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा स्वागताध्यक्ष  सुरेश बनसोडे व शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली.
     उद्घाटनापूर्वी महापुरुषांना अभिवादन करून शाहिरी जलसा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.यामध्ये शाहीर कल्याण काळे,भारुड सम्राट हमीद सय्यद, शाहीर भारत गाडेकर, वसंत डंबाळे, डॉ.शेषराव पठाडे, प्रशांत सूर्यवंशी, दिगंबर गोंधळी, हौसीनाथ बोर्डे व शब्दगंधची टीम सहभागी होणार आहे.दुपारी २  वाजता "आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचे चित्रण" या विषयावर निलिमाताई बंडेलु यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यामध्ये संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्त्यां निलीमा क्षत्रिय, मॅक्सवुमन मुंबईच्या संपादिका प्रियदर्शनी हिंगे सहभागी होणार आहेत. 

दुपारी ३ ते ५ कवयित्री माधुरीताई मरकड यांच्या अध्यक्षतेखाली खुले काव्य संमेलन ( कवी कट्टा)होणार असून यावेळी दंगलकार नितीन चंदनशिवे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे,प्राचार्य चंद्रकांत भोसले, प्रा.शशिकांत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दुपारी ५ वाजता " बदलते ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृती " या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यामध्ये प्राचार्य डॉ.संजय नगरकर, लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके,साथी शिवाजी नाईकवाडी, प्रा.डॉ.गणेश मोहिते सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे चे कोषाध्यक्ष,गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या अध्यक्षतेखाली गझल काव्य संमेलन होणार असून यामध्ये माधव सावंत, हनुमंत येवले, संजय पठाडे, रज्जाक शेख ,साहेबराव घुले, सरिता कलडोणे, प्रशांत वाघ, विक्रम कांबळे, राम गायकवाड, बबन धुमाळ,इकबाल काकर, बाळासाहेब गिरी, अरुण कटारिया, धनंजय तांदळे, सुहास घुमरे, हुमायून आतार,अजय त्रिभुवन, कुणाल शिरोडे, राजू आठवले, अंजली दीक्षित सहभागी होणार आहेत. 

   रविवारी सकाळी ९/३० वा.कथा व काव्य लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रा.डॉ.संजय पाईकराव, संदीप रोहकले यांच्या हस्ते होणार असून प्राचार्य डॉ.अशोकराव ढगे,प्राचार्य बाळासाहेब सागडे,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह जयंत येलूलकर, अभिनव खानदेश चे संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहेत.प्रारब्ध - सौ.एस.एम. मिर्झा, अंतरी - सुरेखा घोलप, माणसं असे अन तसेही - बाळासाहेब देशमुख, निशब्द भावना - विनय पिंपरकर इत्यादी पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होणार आहे. 

सकाळी १०/३०  वा.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य कविवर्य प्रकाश होळकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रिताचे काव्य संमेलन होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आठव्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कविवर्य प्रकाश घोडके, हनुमंत चांदगुडे उपस्थित राहणार आहेत.या काव्य संमेलनात बाळ पाटील, चंद्रकांत कर्डक, भास्कर निर्मळ,दशरथ शिंदे, शारदा घोडके, डॉ.कैलास दौंड, अर्जुन देशमुख, शुभांगी राऊतमारे, लक्ष्मण खेडकर, वर्षा चौबे,डॉ.स्वाती पाटील, वसंत मुरदारे,अशोक निंबाळकर,माधुरी चौधरी, डॉ.प्रवीण जाधव, प्रवीण घुले, संदीप राठोड, नागेश शेलार, स्नेहल डाडर,नवनाथ केंदळे, अनिल कुमार होळकर,रिता जाधव इत्यादी महाराष्ट्रातील कवी यामध्ये सहभागी होणार आहेत.
      दुपारी २  वा. असा मी घडलो... हे चर्चासत्र बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  गुलाबराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यामध्ये पद्मश्री राहीबाई पोपेरे,वरिष्ठ तुरुंग अधिकारी रेवणनाथ कानडे, साई एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ.सचिन पांडुळे इत्यादी सहभागी होणार आहेत. 
दुपारी तीन वाजता ग्रंथविक्रेत्यामुळे वाचन चळवळीला पाठबळ मिळते का या विषयावर चर्चासत्र होणार असून यामध्ये लेखक प्रकाशक वाचक साहित्यिक ग्रंथ विक्रेते सहभागी होणार आहेत.
रविवारी दुपारी ४ वा.१७ व्या शब्दगंध संमेलनाचे पारितोषिक वितरण व समारोप अहिल्यानगर चे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असून यावेळी माजी आमदार कविवर्य लहू कानडे, पाथर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्ष अभयराव आव्हाड,सीएसआडीचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, बापूसाहेब भोसले, कॉ. बाबा आरगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

या संमेलनात प्रा.डॉ.गणी पटेल, छत्रपती संभाजीनगर व आयु. अशोकराव गायकवाड, अहिल्यानगर यांना शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून मातोश्री यमुनाबाई पांडुळे स्मृती पुरस्कार ॲड रंजनाताई गवांदे यांना देण्यात येणार आहे.तसेच विविध साहित्य कृतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.आत्तापर्यंत झालेल्या शब्दगंध संमेलनाध्यक्षांची भाषणे " शब्दसंचित " या सुनील गोसावी संपादित ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
१७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनातील सर्व कार्यक्रमांसाठी साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे,शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे,संयोजन समिती सदस्य संजय खामकर,परिमल निकम,जयंत गायकवाड, भगवान राऊत, डॉ.अशोक कानडे, भारत गाडेकर, जयश्री झरेकर, प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर, राजेंद्र फंड, प्रा.डॉ. अनिल गर्जे,स्वाती ठुबे, बबनराव गिरी,सुभाष सोनवणे,हर्षल आगळे, मकरंद घोडके, शर्मिला गोसावी,राजेंद्र पवार, रवींद्र दानापुरे, प्रशांत सूर्यवंशी व राजेंद्र चोभे यांनी केले आहे.

मंगळवार, १९ मे, २०२६

गोदावरी वसाहत आणि 340 गट नंबर मधील जागा रहिवाश्यांच्या नावावर करणार - डॉ. विखे पाटील

गोदावरी वसाहत आणि 340 गट नंबर मधील जागा रहिवाश्यांच्या नावावर करणार - डॉ. विखे पाटील 


राहाता 
 राहाता तालुक्यातील साकुरी येथील गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे नाव सात बारा उताऱ्यावर येईल. आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पाळला असल्याचे प्रतिपादन भाजपा चे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. .

  राहाता तालुक्यातील साकुरी येथील गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे जागेच्या संदर्भात विशेष पाठपुरावा करून तेथील रहिवाश्यांच्या नावावर जागा करण्याबाबत डॉ. विखे पाटील यांनी रहिवाशी व स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक राहाता बाजार समितीत घेतली. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ, मोहन सदाफळ, संजू सदाफळ, डॉ स्वाधीन गाडेकर, नगराध्यक्ष, विजय सदाफळ उपनगराध्यक्ष नगरसेवक कैलास सदाफळ, मुन्ना शहा, राजेंद्र निकाळे, सुधाकर दंडवते, कानीफ बावके, संदिप दंडवते, भारत बनसोडे, सचिन बनसोडे, शिवाजी नजन,सतिश बावके, विकास बावके, हरिश श्रीखडे, रमेश गायकवाड, पप्पू बनसोडे, बबन बनसोडे, अक्षय रोहोम, बाबासाहेब डांगे, रावसाहेब बनसोडे, पुंडलिक बावके, नंदा माळी, चंद्रकांत बनसोडे, बाळू जाधव, सुनील लोखंडे, दीपक शिंदे, दीपक दंडवते, शहा, किशोर दंडवते आदी यावेळी उपस्थित होते. 
       आपल्या भाषणात डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, राहाता येथील 340 आणि साकुरीची गोदावरी वसाहत या जागेबाबत अनेक मोठ्या तंत्रिका अडचणी निर्माण झाल्या होत्या. जागा वनविभागाची आहे आणि अनेक अडचणी येतील अशी काहींनी शंका उपस्थित केली होती. परंतु सुजय विखे पाटलांनी दिलेला शब्द पूर्ण करतात, हा सर्व सामान्य जनतेला विश्वास होता. आणि आपण या बाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून विश्वास सार्थ ठरवला. या जागेच्या बाबतीत सर्वात मोठी अडचण सातबाऱ्यावर सरकार असे नाव लागले होते. गुंतागुंत वाढली होती. परंतु दोन दिवस आधी आपण महाराष्ट्र शासन असे नाव लावून घेतले. त्या मुळे आता कायदेशीररित्या स्थानिक नागरिकांच्या नावावर जागा करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या मुळे तुमची जागा तुमच्या नावावर फक्त आणि फक्त सुजय विखे च करू शकतो! असे सांगून डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, अनेक वर्षापासून जागा नावावर करण्याचा संघर्ष 340 व गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे संपला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा प्रश्न सोडविला. विधानसभेच्या निवडणुकीत तुमची जागा तुमच्या नावावर करून देतो हा शब्द आपण पाळला. याचा आपल्याला अभिमान आहे. आपण राजकारणात ऐश्वर्य कमावले, वैभव कमावले परंतु आपण विश्वासाहर्ता कमावली हा मोठा आनंद आहे. शिर्डीतील लक्ष्मीनगर भागातील आपल्या शब्दावर काढले. पोलिस फाटा लागला नाही. त्या मुळे आता प्रत्येकाच्या नावावर 25 लाख रुपये किमतीची जागा झाली आहे. 
      सर्वांच्या विश्वासामुळे पालिकेत निर्विवाद सत्ता मिळाली. साकुरीतही आपण 5 कोटींचे कामे करू शकलो. अंतर्गत गटारी, रस्त्यांचे कामे मार्गी लागली. तुम्ही सर्वजण मतभेद विसरून एकत्र आला म्हणून हे शक्य झाले. राहाता शहराला किती निधी दिला. हे मी आत्ता सांगणार नाही. 
    मतदार संघात धर्म, जात याला थारा देणार नाही. गुन्हेगारीला साथ देऊ नका. आपल्याला मतदार संघातील गुन्हेगारी मोडीत काढायची आहे. मुलींची कुणी छेड काढत असेल तर त्याच्या घरावर बुलडोझर चालविण्यास मागे पुढे पाहणार नाही. असा इशारा डॉ. विखे पाटील यांनी गुन्हेगारांना दिला.

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D2, झोन 16 अहिल्यानगर झोन SOCIAL 2026

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D2, झोन 16 अहिल्यानगर झोन SOCIAL 2026 


राहता येथील साई विठ्ठला लॉन्स येथे दिनांक 22 मे रोजी अहिल्यानगर झोनचा बहुप्रतिक्षित “झोन SOCIAL” कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन अहिल्यानगर झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2026-27 लायन श्रेयस दीक्षित, फर्स्ट व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र गोयल, सेकंड व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन सुनीता मालपाणी, पास्ट मल्टिपल कौन्सिल चेअरमन लायन गिरीशभाऊ मालपाणी, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश कोठावडे, कन्व्हेनर लायन सुधीर डागा व को-कन्व्हेनर लायन प्रकाश सदाफळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 9 लायन्स क्लब व 3 लिओ क्लबमधील प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर, कॅबिनेट ऑफिसर्स, सिनियर पदाधिकारी व जवळपास 200 लायन सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

या “झोन SOCIAL” मध्ये विविध आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये — 📸 फोटो कॉन्टेस्ट
🎨 बॅनर प्रेझेंटेशन
🎶 समूह गायन स्पर्धा
🎵 धमाल संगीत संध्या

यांचा समावेश आहे.

संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, अंध-अपंग सेवा व समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या क्लबचा गौरव झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. विविध क्लबच्या उत्कृष्ट कार्याची माहिती सर्वांसमोर मांडून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

राहता येथे प्रथमच डॉ. संजय उबाळे यांच्या रूपाने इतक्या मोठ्या स्तरावर झोन SOCIAL चे आयोजन होत असून, त्यामुळे राहता शहरासाठी हा अभिमानाचा क्षण ठरत आहे. राहता क्लबचे सर्व सदस्य एकदिलाने कार्य करून क्लब वृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

या कार्यक्रमासाठी लायन एकनाथ गोंदकर, लायन श्रीनिवास भंडारी, लायन तुलसीदास खुबानी, प्रविण गुलाटी, हरजितसिंग वाधवा, संदीप रोहमारे, आशिष बोरावके, आनंद ठोळे, कल्याण कासट, राहुल अरबटी, अक्षय गिरमे, महेश वैद्य, संजय असावा, संतोष माणकेश्वर, संदीप गोंदकर, धनंजय धुमाळ, सचिन शहा व इतर अनेक लायन सदस्य उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन डॉ. संजय गायकवाड, प्रकाश सदाफळ, ॲड. गोरखभाऊ दंडवते, दीपक दंडवते, ॲड. संतोष घोडके, ॲड. दिनेश कारले, मुन्नाभाई शहा, व्यंकटेश अहिरे, राजेंद्र बांगर, सुनील हासे, नीलेश चोरडिया, डॉ.लीना उबाळे,संतोष उबाळे, साहेबराव गायकवाड, डॉ.जयंत घोडेराव,सुरेश गायकवाड ,अंजली उबाळे, सोहन उबाळे, सरला तायडे, स्मिता मुरादे, उमेश शेटे, लता जाधव,डॉ मनाली उबाळे, डॉ. शर्वरी कुलकर्णी, संध्याताई कारले, श्वेता कारले, अर्चना दंडवते, रतन चौधरी, खिजर शहा, आसावरी बेंद्रे तसेच राहता क्लबचे सर्व पदाधिकारी व सभासद परिश्रम घेत आहेत.

🌟 हा कार्यक्रम आनंद, मैत्री, सेवा आणि उत्साहाचा अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे. 🌟
झोन कार्यक्रमासाठी झोन चेअरमन डॉ संजय उबाळे, कन्व्हेनर लायन सुधीर डागा, झोन सेक्रेटरी लायन ॲड कल्याण कासट, ट्रेजरर लायन संदीप  राशीनकर यांनी उपस्थित राहावे असे आव्हान केले आहे

सोमवार, १८ मे, २०२६

फळबागांचे मोठे नुकसान; प्रभावती घोगरे मैदानात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

फळबागांचे मोठे नुकसान; प्रभावती घोगरे मैदानात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

(राहाता)
 : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती घोगरे यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
गोगलगाव येथील रहिवासी शेतकरी विनायक चौधरी यांच्या संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथील शेतातील फळबागेला या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर मोठ्या प्रमाणावर कच्ची फळे गळून पडली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पाहणीदरम्यान प्रभावती घोगरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानाचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश देत शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
“अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने विलंब न करता तातडीने मदत जाहीर करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी,” असे त्या म्हणाल्या.
तसेच, भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, पीक विमा योजनांचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पाहणीवेळी विलास गुळवे, शेतकरी विनायक चौधरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही आपल्या नुकसानीबाबत माहिती देत शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...