शिर्डी
अहिल्यानगर मुख्य रस्त्यावरील साईड गटारीचे काम रस्त्याच्या कडेला न घेता रस्त्यावरच गटारीचे बांधकाम करण्यात येत असल्याने रस्ता कृत्रिमरीत्या अरुंद केला जात आहे. यामुळे केवळ सध्याची वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही, तर भविष्यात त्याठिकाणी अनधिकृत अतिक्रमणे वाढण्याचीही दाट शक्यता आहे. याबाबत तात्काळ संबंधीतांना आदेश देवुन चुकीचे जागेवर होत असलेले गटारीचे काम त्वरीत थांबवुन साईड गटार रस्त्याच्या कडेला घेण्यात यावी असे निवेदन भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना समक्ष भेटुन दिले यावेळी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, शिर्डी ते अहिल्यानगर या अत्यंत महत्वाच्या मुख्य रस्त्याचे काम चालु आहे. सदर रस्ता राहाता शहरातून जात असताना तो आधीपासूनच रुंद स्वरूपाचा असूनही, सध्या करण्यात येणाऱ्या साईड गटाराच्या कामामुळे रस्त्याची प्रत्यक्ष वापरातील रुंदी कमी होत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्टपणे दिसून येत आहे. राहाता शहरातून जाणारा हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असून या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात जड व हलकी वाहतूक होत असते. त्यातच रस्त्यालगत शाळा, महाविद्यालये, रुग्णालये,आठवडे बाजार, व्यापारी संकुले व वस्ती असल्यामुळे रस्ता अधिक रुंद व मोकळा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या साईड गटाराच्या कामामुळे रस्त्यावर अतिक्रमण होण्याची शक्यता वाढून भविष्यात वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो.
विशेष म्हणजे, रस्ता मोकळा असतानाही रस्त्याच्या प्रत्यक्ष भागावरच गटारीचे बांधकाम करण्यात येत असल्याने रस्ता कृत्रिमरीत्या अरुंद केला जात आहे. यामुळे केवळ सध्याची वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही, तर भविष्यात त्याठिकाणी अनधिकृत अतिक्रमणे वाढण्याचीही दाट शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर शहरातून जाणाऱ्या उपलब्ध रस्त्याचे त्वरीत संपूर्ण डांबरीकरण करून तो अधिक रुंद करण्यात यावा व रस्त्याच्या बाहेरील बाजूस साईड गटाराचे काम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे राहाता शहरातील वाहतुकीची अडचण दूर होऊन नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवास करता येईल. जिल्हाधिकारी कार्यालय येथे दोन्ही खासदारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीतही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला यावर खा.भाऊसाहेब वाकचौरे व खा.निलेश लंके यांनी संबंधीत अधिकां-यांना सुचना देवुन यावर लक्ष घालुन शहरातुन जाणारा रस्ता अरुंद न होता साईड गटार रस्त्याच्या कडेला घेण्याच्या सुचना केल्या.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, यासाठी संबंधित विषयावर जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची समक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात आले. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा