कोपरगाव ते नगर या राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या सोडविण्यासाठी देखील आपण पुढाकार घेणार - खासदार भाऊसाहेब वाकचौरे
राहाता
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने निवडून दिल्यानंतर गेल्या शंभर दिवसांत लोकसभेची दोन अधिवेशने झाली. त्यात विविध विषयांवर सत्तावीस प्रश्न विचारले. बिबट्यांनी उच्छाद मांडल्याने जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांच्या ग्रामीण भागातील जनता भीतीच्या सावटाखाली आहे. शिर्डी विमानतळ केंद्राकडे दिल्याशिवाय त्याचे रडगाणे संपणार नाही. कोपरगाव ते नगर या राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या सोडविण्यासाठी देखील आपण पुढाकार घेणार आहोत, अशी माहिती खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पहिल्या शंभर दिवसांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी पत्रकारांसमवेत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. सरस्वतीताई वाकचौरे व वसंतदादा मल्टिस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव शिनगर उपस्थित होते.
यावेळी खासदार वाकचौरे म्हणाले की, गोदावरी, प्रवरा आणि मुळा या तीन नद्यांच्या काठी मोठ्या प्रमाणावर उसाचे पीक आहे. तेथे बिबट्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. संख्या वाढल्याने त्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला. ग्रामीण भागात सायंकाळनंतर शेतकरी शेतात जाणे बंद झाले. बिबट्यांच्या हल्ल्यात बळींची संख्या वाढते आहे. लोक मोठ्या संख्येने या तक्रारी घेऊन आपल्याकडे येतात. हे बिबटे पकडून त्यांना संरक्षित जंगलात सोडणे गरजेचे आहे. दिवसागणिक हे संकट अधिक तीव्र होत चालले आहे. शिर्डी विमानतळावरील विमानांचे तिकीट अन् शेजारच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील
विमानांचे तिकीट यात मोठी तफावत जाणवते. उडाण योजनेत शिडों विमानतळ सहभागी करून घ्यावे, तसेच हे विमानतळ केंद्र सरकारकडे हस्तांतरीत करावे. यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. पुणतांबे ग्रामस्थांनी रेल्वेच्या प्रश्नाबाबत आंदोलन केले. त्यांच्या मागण्यांचा आपण पाठपुरावा करीत
आहोत. कोपरगाव-झगडेफाटा - संगमनेर या महत्त्वाच्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा, पेन्शनर मंडळींच्या प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम त्वरित मिळावी, पुणे ते संगमनेर- नाशिक व श्रीरामपूर ते गेवराई नियोजित रेल्वेमार्ग व्हावा. गेल्या पंचवीस वर्षांपासून सावळीविहीर ते नगर राष्ट्रीय महामार्गाचे रडगाणे अद्यापही सुरू आहे. याकडे आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधणार आहोत. पश्चिमेचे पाणी पूर्वेला गोदावरी, प्रवरा, मुळा या नद्यांच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला गती द्यावी. निळवंडे कालवे आणि वितरिकांची कामे वेगाने पूर्ण व्हावीत, निळवंडेचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध व्हावे या मागण्यांसाठी आपण केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत अशी माहिती खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा